*सहानुभूती एवढीच अपेक्षा

 .

ह्या पोरी कधीतरी नवीन नवरी म्हणून गावात आल्या असतील. नवीन नवीन सासरी आल्यावर माहेरची ओढ असेल, “ह्या गावात करमतच नाही बया” असं कधी उघड एखाद्या मैत्रिणी जवळ म्हणत असतील किंवा मनातल्या मनात म्हणत असतील.

.

एखाद लेकरू बाळ झाल्यावर कौतुकाने माहेरी गेल्या असतील. दिवस सरत गेल्यावर हळू हळू समजलं असेल की ज्याला आपण आपलं गाव समजत होतो ते आता पाव्हण्याचे गाव झालं आहे आणि ज्या गावात नवीन नवीन आपल्याला करमत नव्हतं तेच आता आपलं गाव आहे.

.

बाई माणसाला किती बदलावं लागतं ह्या जगात.

मामाच्या गावाला जाणारी लेकरं हळू हळू कमी होत बंद झाल्यावर समजून येतं की आपले आई बाप गेले आणि लेकरांच्या मामाचं गाव पण तुटलं.

.

आता राहिलं ,हे “आपलं गाव “ जे गाव लग्न होईपर्यंत आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं ते गाव आपलं होऊन जातं.

.

ह्या म्हाताऱ्यांचं सरपण नदीला गेलंय पण ह्या अजून खंबीरपणे गावातच आहेत. नदीला आणि सरपणाला चकमा देत. नातीचं लगीन बघणार, नातवाचं लगीन बघणार.

.

परवा गावी गेल्यावर गल्लीतील एका लग्नात एका म्हातारीला खांद्यावर उचलून लग्न मंडपात आणलं होतं. म्हातारीच्या डोळ्यात पाणी मायना. काही लोक म्हणतात लग्न सरकारी कार्यालयात करा, देवळात हार घालून या. म्हणजे आम्हा लोकांच्या आयुष्यात येणारे एकदोन आनंदाचे क्षण पण जगू नका.

.

आपण अशा अर्थव्यवस्थेत राहतो की काही मोजके लोक दरवर्षी फॉरेन ट्रिप करतात तर नव्वद टक्के लोकांना पूर्ण आयुष्यात एक लग्न समारंभ सुद्धा परवडत नाही.

.

थोडी सहानुभूती हीच त्यांची अपेक्षा….!

स्त्रोत :

साभार : श्री विकास गोडगे…फेसबूक


Comments

Popular posts from this blog

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा